जळगाव प्रतिनिधी | विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिक रंगतदार आणि चुरशीचे होत चालले आहे. महायुतीतील घटक पक्ष वरवर एकजूट असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. या राजकीय घडामोडींमुळे निवडणुकीचे संपूर्ण गणित बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून, महायुतीतील या कलहाचा सर्वाधिक फायदा अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी, नंदकिशोर महाजन हे मंत्री गिरीश महाजन यांचे उमेदवार असल्याचे विधान केले होते. या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच, गिरीश महाजन यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत, उमेदवार हा संपूर्ण भाजपाचा आहे, कोणत्याही एका नेत्याचा नाही, असे स्पष्ट केले.
नेत्यांच्या या परस्परविरोधी भूमिकांमुळे भाजपातील अंतर्गत नाराजी आणि गटबाजी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. त्यातच महायुतीच्या स्थानिक राजकारणात भाजप आणि शिवसेना यांच्यातील समन्वयाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षित उत्साह नसल्याने त्याचा थेट परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदारांवर होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
याच पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांचे नाव अचानक चर्चेत आले आहे. चौधरी यांची राजकीय वाटचाल विविध पक्षांच्या नेत्यांशी जवळीक असलेली राहिली आहे. ते मूळचे शिवसैनिक असले तरी काही काळ त्यांनी भाजपाशीही राजकीय संबंध ठेवले होते. त्यामुळे सर्वच पक्षांतील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षीय निष्ठेपेक्षा वैयक्तिक संबंधांना अधिक महत्त्व असते.
महायुतीतील धूसफूस वाढल्यास मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट लाभ चौधरी यांना मिळू शकतो. महायुतीतील मतभेद अधिक तीव्र झाल्यास निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो. त्यामुळे महायुतीतील कलहाचा सर्वात मोठा लाभार्थी अनिल चौधरी ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



