जामनेर प्रतिनिधी । यावर्षी शेतीच्या मशागतीची सर्व कामे आटोपून शेतकरी बांधव मोठ्या आतुरतेने पावसाची प्रतीक्षा करत होते. यंदाही पावसाचे आगमन विलंबाने झाले असले, तरी काही दिवसांपूर्वी झालेल्या समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला होता. मात्र, जामनेर तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील एका शेतकऱ्यासाठी हा पाऊस नुकसानीचा ठरला आहे. येथील शेतकरी संजय निमचंद तेली यांच्या शेततळ्याची एक बाजू काल झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेली.
शेततळे फुटल्यामुळे पाण्याचा आणि मातीचा प्रचंड भराव थेट शेजारीच असलेल्या विहिरीत गेल्याने विहीर पूर्णपणे खचली व बुजली आहे. यामुळे शेतकरी संजय तेली यांच्यासमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या आरोपानुसार, “शेततळे तयार करताना कामाच्या गुणवत्तेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. जर काम दर्जेदार झाले असते, तर आज माझे एवढे मोठे नुकसान झाले नसते.” विहिरीत गेलेला गाळ आणि भराव बाहेर काढण्यासाठी आता मोठा खर्च येणार असून, त्यासाठी पैसे कुठून आणायचे, असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दुसरीकडे, या शेततळ्याच्या देखरेखीसाठी नियुक्त असलेले उपअभियंता राहुल खानापुरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कामाच्या गुणवत्तेत कोणताही हलगर्जीपणा किंवा टाळाटाळ झाली नसल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून शेततळ्याच्या वाहून गेलेल्या ठिकाणी दुसरा भराव टाकण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. मात्र, “शेततळे दुरुस्त होईल, पण माझ्या विहिरीच्या झालेल्या नुकसानीचे काय? मला न्याय मिळणार का?” असा संतप्त सवाल शेतकरी संजय तेली प्रशासनाला विचारत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.



