जळगाव प्रतिनिधी | शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरातील तडवीवाडा येथे राहणाऱ्या एका ४० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी २९ जून सकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील हिरामण बोरसे (वय ४०, रा. तडवीवाडा, हरी विठ्ठल नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुनील बोरसे हे पत्नी मायाबाई आणि दोन मुलांसह वास्तव्यास होते. पती-पत्नी दोघेही जैन कंपनीत कामाला जात होते.
सोमवारी सकाळी मायाबाई बोरसे या नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी उठल्या. त्यावेळी त्यांनी घराच्या पुढील खोलीत पतीने गळफास घेतल्याचे पाहिले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने सुनील बोरसे यांना खाली उतरवून तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
सुनील बोरसे यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी मायाबाई तसेच जय आणि प्रेम ही दोन मुले असा परिवार आहे. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.



