जळगाव प्रतिनिधी | विठ्ठल नामाचा जयघोष, पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि सुदृढ आरोग्याचा संकल्प घेऊन जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या सायकल वारीने गुरुवारी, ९ जुलै रोजी पहाटे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. आकाशवाणी चौकातून सकाळी साडेपाच वाजता उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या वारीत जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी सलग दुसऱ्या वर्षी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे, त्या स्वतः सायकल चालवत तीन दिवसांत तब्बल ४८५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत.
जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे दरवर्षी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सायकल वारीचे आयोजन केले जाते. यंदाची वारी ९ ते ११ जुलैदरम्यान होणार असून, सायकलस्वारांचा समूह शनिवारी संध्याकाळपर्यंत पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
वारीला निरोप देण्यासाठी आकाशवाणी चौकात पहाटेपासूनच जळगावकरांनी मोठी गर्दी केली होती. महिला भगिनींनी सायकलस्वारांचे औक्षण करून सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रगीताच्या गायनानंतर विठ्ठल नामाचा जयघोष करत सायकलस्वार पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.
महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, ही सायकल वारी केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नसून आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी चळवळ आहे. नियमित सायकल चालवल्यामुळे आरोग्य उत्तम राहते, इंधनाची बचत होते आणि प्रदूषण कमी करण्यासही मदत होते. हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या वारीमागे असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंढरपूर येथे विठ्ठल चरणी जळगाव जिल्ह्याची समृद्धी, शेतकऱ्यांचे सुख आणि जळगाव शहराच्या शाश्वत विकासासाठी साकडे घालणार असल्याचेही महापौर काळे यांनी सांगितले. स्वच्छ, सुंदर आणि हरित जळगावच्या विकास व्हिजनला बळ मिळावे, अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



