जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली होती. पोलीस अधिक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी पाच अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात गुन्हेगारी टोळीचा मुख्य म्होरक्या गुरुजीत सिंग सुजानसिंग बावरी (वय २६, रा. तांबापुरा) याच्यासह दीपक बापू पाटील (वय २३), राजेश माणिक राठोड (वय २४), सुमित संजय कोळी (वय १९) आणि महेश उर्फ संतोष भोई (वय २४, सर्व रा. जळगाव) या पाच अट्टल आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी तब्बल १० गुन्ह्यांची कबुली दिली, ज्यामध्ये ०९ घरफोडी आणि ०१ मोटार वाहन चोरीचा समावेश आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी २ लाख ३० हजारांचा घरफोडीतील मुद्देमाल आणि २ लाख रुपयांच्या ४ मोटारसायकल, असा एकूण ४,३०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मुख्य आरोपी गुरुजीतसिंग बावरी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर एमआयडीसी, जिल्हा पेठ आणि तालुका पोलीस स्टेशनमध्ये एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र, कारागृहातून सुटताच त्याने पुन्हा चोऱ्यांचे सत्र सुरू केले होते.
सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, सपोनि नयन पाटील, उपनिरीक्षक विजय पाटील, यज्ञजीता येडले व त्यांच्या विशेष पथकाने केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जळगावमधील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.



