रावेर प्रतिनिधी | अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका मजुराच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणात रावेर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना अटक केली असून हत्येचे गूढ उलगडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आणि मुख्य आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. मात्र, मुख्य आरोपी गणेश संजय घोरपडे (वय 27, रा. भोर, ता. रावेर) याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. एप्रिल 2026 मध्ये आरोपीला ऐनपूर येथे ग्रामस्थांनी रंगेहात पकडून मारहाण केली होती. त्यानंतर आरोपीने मयताला “माझ्या प्रेमात तू आडवा आलास तर तुला ठार मारीन,” अशी धमकी दिल्याचे तपासात समोर आले आहे.
दरम्यान, 9 जुलैच्या रात्री गणेश घोरपडे आणि त्याचा साथीदार मेघराज वसंत सांगळे (वय 29) यांनी मयताला दारू पाजली. त्यानंतर मोटारसायकलवरून नांदूरखेडा शिवारात नेऊन त्याचा हाताने गळा आवळून खून केला. पुरावे लपविण्याच्या उद्देशाने मृतदेह शेतात टाकून दोघांनी घटनास्थळावरून पलायन केले.
या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक केली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.



