जळगाव प्रतिनिधी | गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत स्थानिक ‘भक्तीनाद’ भजन संध्या ग्रुप आणि संतश्रेष्ठ गजानन महाराज बहुउद्देशीय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तिमय वातावरणात ‘भजन संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा स्वरमय सोहळा बुधवार, 29 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता मोहाडी रोडवरील श्री गजानन महाराज मंदिर प्रांगणात पार पडणार असून, परिसरातील भाविकांसाठी हा आध्यात्मिक मेजवानीचा आनंददायी क्षण ठरणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक गुरुपूजनाने होणार असून, त्यानंतर विविध भक्तिगीतांचा सुरेल कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमात गायक गुलाब कापडणे, विनायक रडे, सुभाष मिस्त्री तसेच गायिका वृंदा पालखे आणि प्रवीण पाटील आपल्या सुमधुर आवाजातून भक्तीगीतांची बहार उडविणार आहेत. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण आणि रसाळ निवेदन कलावंत तसेच ‘भक्तीनाद’ ग्रुपचे संचालक तुषार वाघुळदे करणार आहेत.
‘गण गण गणात बोते…’ या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार असून, गुरु-शिष्य परंपरेचे स्मरण, अध्यात्माची अनुभूती आणि भक्तिमय वातावरणाचा आनंद नागरिकांना घेता यावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भक्तिमय सोहळ्यास परिसरातील नागरिक, भाविक आणि संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘भक्तीनाद’ ग्रुपचे तुषार वाघुळदे तसेच संतश्रेष्ठ गजानन महाराज बहुउद्देशीय ट्रस्टचे अध्यक्ष अरुण सोनवणे, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश दप्तरी, सचिव संजय येवले आणि विश्वस्त प्रकाशचंद्र वडनेरे, मधुकर पाटील, हेमंत विसपुते, अतुल मुळे, सुधीर सोनवणे व रवींद्र पाटील यांनी केले आहे.



