यावल | प्रतिनिधी : यावल शहरातील राज्यातील एकमेव महर्षी व्यास मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवारी मोठ्या भक्तिभावात उत्सव साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून तसेच शेजारील राज्यांतून आलेल्या हजारो भाविकांनी भगवान वेदव्यासांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केला.
उत्सवानिमित्त सकाळी महर्षी व्यासांची विधिवत महापूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर दिवसभर भाविकांसाठी दर्शन खुले ठेवण्यात आले. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिराचे आकर्षक सुशोभीकरण भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होते.
भाविकांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २१ क्विंटल बुंदी आणि २५ क्विंटल तांदळापासून तयार करण्यात आलेल्या भाताच्या प्रसादाचे हजारो भाविकांना वितरण करण्यात आले. तसेच मंदिर संस्थानातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अनेक भाविकांनी त्याचा लाभ घेतला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मंदिर परिसर व उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्पही संस्थेने केला. महेलखेडी, कोरपावली, चितोडा, सांगवी, टाकरखेडा, बोरावल, राजोरा, मनवेल, दहिगाव आदी गावांतून टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंड्या मंदिरात दाखल झाल्याने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
उत्सवादरम्यान सुमारे १०० स्वयंसेवक आणि यावल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत भाविकांना सुरळीत दर्शनाची व्यवस्था केली. धार्मिक परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा गुरुपौर्णिमा उत्सव यंदाही उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.



