जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नाल्यांना पूर आल्याने विविध भागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनांनंतर महापालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शनिवारी सकाळपासून महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी शहरातील विविध नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
बिभानगर, सुप्रीम कॉलनी, तुकाराम वाडी, ममुराबाद आदी भागांमध्ये नाल्याच्या पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर संबंधित भागांना भेट देऊन पाणी साचण्यामागील कारणांचा शोध घेण्यात आला. नागरिकांच्या अडचणी जाणून घेत प्रशासनाने आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, नाल्यांचे पाणी घरांमध्ये शिरण्यामागील तांत्रिक त्रुटींचा अभ्यास करून त्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी नियोजन केले जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपमहापौर मनोज चौधरी यांनी सांगितले की, शहरातील काही रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या बांधकामांमुळे पावसाचे पाणी साचण्याची समस्या निर्माण होत आहे. या बाबीची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठविण्यात आले असून, आवश्यक दुरुस्ती आणि सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील पूरस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन विविध विभागांच्या समन्वयाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या तयारीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



