मुक्ताईनगर प्रतिनिधी | तालुक्यातील बेलसवाडी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादात १९ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलसवाडी येथील साबीर खान मेंबर यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर शुक्रवारी रात्री सुमारे ९ वाजता ही घटना घडली. मयत अबुजर रफीक शेख (वय १९) आणि अल्पवयीन मुलामध्ये यापूर्वी मस्करी करण्याच्या कारणावरून वाद झाला होता. याच जुन्या भांडणाच्या कारणातून पुन्हा वाद झाल्यानंतर अल्पवयीन मुलाने अबुजरच्या छातीत चाकूने वार केल्याचा आरोप आहे. चाकूच्या वारामुळे अबुजर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नेण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.
याप्रकरणी मयताचे वडील रफीक शेख नुरा (वय ४०) यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.



