जळगाव | परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर प्रत्येकाला आपले भविष्य घडवता येते. गरिबी ही शिक्षणाच्या मार्गातील अडचण असली, तरी ती विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची मर्यादा ठरू शकत नाही, असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. पाळधी येथील सुगोकी रिसॉर्टमध्ये GPS मित्र परिवाराच्या पुढाकाराने आयोजित ‘मदतीचा हात’ उपक्रमात ते बोलत होते.
GPS मित्र परिवार, मनोजभाऊ चौधरी मित्र परिवार आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्ट यांच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमात जळगाव व धरणगाव तालुक्यातील ७९२ निराधार व गरजू विद्यार्थ्यांना दप्तर, बूट-चप्पल, पाण्याची बाटली आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
“आज माझ्यासमोर ७९२ विद्यार्थी नाहीत, तर ७९२ स्वप्ने आहेत. याच विद्यार्थ्यांमधून भविष्यात डॉक्टर, शिक्षक, अधिकारी, अभियंते, सैनिक, उद्योजक आणि कर्तृत्ववान नागरिक घडतील,” असे पालकमंत्री पाटील म्हणाले. विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा न्यूनगंड न बाळगता मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील अनाथ आणि एकल पालकांच्या मुलांना शासनाच्या योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी सुमारे ४ कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. अनाथ प्रमाणपत्र व बालसंगोपन योजनेची प्रक्रिया ऑनलाइन करण्याबरोबरच एकल महिलांसाठी उद्योजकता केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण, उत्पादन, ब्रँडिंग व विक्रीसाठी मदत देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
निराधार बालकांसाठी अनाथाश्रम तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम उभारण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी विद्यार्थ्यांना परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी बालसंगोपन योजनेचा आतापर्यंत सुमारे ८ हजार मुलांना लाभ मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमात चिंचपुरा येथील सहा वर्षीय ईयांश पाटील ऊर्फ ‘माऊली महाराज’ याने सादर केलेल्या गवळणीने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास विविध मान्यवर, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



