चाळीसगाव प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसला चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात अपघात झाला. बसच्या स्टिअरिंग यंत्रणेत बिघाड झाल्याने अचानक चालकाचा बसवरील ताबा सुटल्याची प्राथमिक माहिती आहे. बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याकडे गेली आणि कठड्याला अडकून थांबली.
या बसमधून तब्बल ५९ प्रवासी प्रवास करत होते. अचानक बसचा ताबा सुटल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. बस कठड्याला अडकल्यानंतर भीतीने काही प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अखेर सर्व प्रवासी सुरक्षितपणे बसमधून बाहेर पडले आणि त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
या अपघातात चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बसचे स्टिअरिंग रॉड तुटले की स्टिअरिंग जाम झाले, याबाबत अधिकृत तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. सुदैवाने बस कठड्याला अडकल्याने मोठा अनर्थ टळला असून ५९ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.



