रावेर प्रतिनिधी : रावेर तालुक्यात यंदाच्या हंगामातील पीक पेऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याचे काम सुरू असून, शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत आपल्या शेतातील पिकांची नोंद प्राधान्याने करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार संजय तायडे यांनी केले आहे. शासनाने यावर्षी पीक पाहणीच्या कामासाठी प्रत्येक गावात पीक पाहणी सहाय्यकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित सहाय्यकांच्या मदतीने पीक पेऱ्याची नोंद करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रावेर तालुक्यात एकूण ६६ हजार ७०० गट असून, आतापर्यंत केवळ १४ हजार ४८३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन पीक पेरे नोंदवले आहेत. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी नोंदणी पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. ३० सप्टेंबर ही पीक पेरे नोंदविण्याची अंतिम मुदत असून, त्यानंतर पीक पेऱ्याची नोंदणी केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पीक पेऱ्याची नोंद ही शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजनांच्या लाभाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. पीक पेऱ्याची नोंद उपलब्ध नसल्यास शासकीय अनुदान, नैसर्गिक आपत्तीतील मदत, पीक विमा तसेच अन्य योजनांच्या लाभासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता आपल्या पिकांची नोंद करून घेणे आवश्यक आहे.
प्रत्येक गावात नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांच्या मदतीने शेतकरी आपल्या शेतातील पिकांची ऑनलाइन नोंद करू शकतात. तसेच शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवर उपलब्ध असलेल्या संबंधित ॲपच्या माध्यमातूनही पीक पाहणी करून पीक पेऱ्याची नोंद करता येणार आहे.
तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेत आपल्या शेतातील पिकांची अचूक नोंद करून घ्यावी. अंतिम मुदत जवळ येत असल्याने शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नये, असे आवाहन तहसीलदार संजय तायडे यांनी केले आहे. पीक पेऱ्याची नोंद वेळेत पूर्ण झाल्यास भविष्यातील शासकीय मदत व विविध योजनांच्या लाभासाठी आवश्यक माहिती प्रशासनाकडे उपलब्ध राहण्यास मदत होणार आहे.



