
जळगाव महापौरपदी कुणाची वर्णी? ‘ओबीसी महिला’ आरक्षणामुळे राजकीय सारीपाट तापला;
जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ‘ओबीसी महिला’ आरक्षण जाहीर होताच शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय राजकीय गणिते वेगाने बदलत असून, भाजपच्या गोटातून महापौरपदासाठी चार प्रबळ दावेदार मैदानात उतरल्याने ही लढत आता अधिक चुरशीची झाली आहे.
दोन नव्हे, आता चार दावेदार!
सुरुवातीला ही लढत केवळ दोन नावांभोवती मर्यादित असल्याचे वाटत होते. मात्र, ज्येष्ठ नेत्यांच्या एन्ट्रीमुळे आता चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे:
कविता सागर पाटील: पिंप्राळा या बालेकिल्ल्यातून २२ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले कट्टर कार्यकर्ते सागर जिजाबराव पाटील यांच्या पत्नी कविता पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या रूपाने एका ‘निष्ठावान’ चेहऱ्याला संधी मिळावी, असा एक मोठा सूर उमटत आहे.
वैशाली अमित पाटील: चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे खंदे समर्थक आणि शहरात सक्रिय असलेले अमित पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील यांच्या नावाचीही प्रबळ दावेदार म्हणून चर्चा आहे.
उज्वला बेंडाळे: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे यांच्या रूपाने एक अनुभवी आणि प्रशासकीय पकड असलेला चेहरा स्पर्धेत आहे.
दीपमाला काळे: सलग चार वेळा नगरसेविका म्हणून निवडून येण्याचा विक्रम नावावर असलेल्या दीपमाला काळे यांच्या नावाचाही दांडगा प्रभाव आहे. ज्येष्ठता आणि अनुभव लक्षात घेता त्यांच्या नावाची वर्णी लागल्यास आश्चर्य वाटायला नको.
महाजन की भोळे? कोणाचा शब्द ठरणार अंतिम?
सध्या संपूर्ण शहराचे लक्ष जळगावचे आमदार राजूमामा भोळे आणि भाजपचे संकटमोचक गिरीशभाऊ महाजन यांच्या निर्णयाकडे लागले आहे. या दिग्गज नेत्यांच्या पसंतीची मोहोर कोणावर उमटणार, यावरच जळगाव महापालिकेचे आगामी नेतृत्व अवलंबून आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला
ओबीसी महिला आरक्षणामुळे अनेक इच्छुकांची गणिते बिघडली असली तरी, या चार नावांनी निवडणुकीत मोठी रंगत आणली आहे. “शेवटी संधी कुणाला मिळणार?” या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिक आता पक्षाच्या अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.


