
हरभरा,कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
जळगाव – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून त्यामुळे कडाक्याची थंडी जाणवत नाहीये. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.
ऐन हिवाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केळी पिकांसह रब्बी हंगामातील गहू, मक्का, ज्वारी, बाजरी, हरभरा, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बदलत्या हवामानामुळे जळगाव जिल्ह्यातील हुडहुडी भरणारी थंडी जवळपास गायब झाली असून ढगाळ वातावरण आणि तापमानातील चढ-उतारामुळे गारठा ओसरल्याचे चित्र दिसून येत आहे. आगामी एक ते दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जळगावकरांना ऐन हिवाळ्यात पावसाळ्यासारख्या वातावरणाचा अनुभव घ्यावा लागत आहे.


