
चार महिन्यांच्या बालिकेसह सहा वर्षांच्या मुलाचाही करुण अंत,आरोपी पतीला अटक
शिक्रापूर प्रतिनिधी : पतीकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या चार महिन्यांच्या मुलीसह आणि सहा वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. पाबळ (ता. शिरूर) येथील एकेरी माळ परिसरात रविवारी (दि. १) ही हृदयद्रावक घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी आरोपी पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली आहे.
अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), सार्थक राजू जाधव (वय ६) आणि गौरी राजू जाधव (वय ४ महिने) अशी मृतांची नावे आहेत. हे कुटुंब मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी येथील असून, सध्या कामाानिमित्त पाबळ येथे वीटभट्टीवर वास्तव्यास होते.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री आणि तिचा पती राजू पांडुरंग जाधव यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक कारणावरून वारंवार वाद होत होते. पतीकडून होणाऱ्या त्रासामुळे भाग्यश्री प्रचंड तणावाखाली होती. रविवारी सकाळी पुन्हा त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर भाग्यश्री आपल्या दोन्ही मुलांना आणि सार्थकची सायकल घेऊन घराबाहेर पडली.
दुपारपर्यंत ती घरी न परतल्याने राजूने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. घरापासून काही अंतरावर असलेल्या परमेश्वर पिंगळे यांच्या विहिरीच्या कडेला मुलाची सायकल आणि चपला दिसून आल्या. विहिरीत शोध घेतला असता, मायलेकरांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले.
पोलिसांची कारवाई आणि तपास
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. एकाच वेळी आईसह दोन निष्पाप चिमुरड्यांचा अंत झाल्याने पाबळ परिसरावर शोककळा पसरली आहे.
मयत भाग्यश्रीची बहीण जयश्री सुनील जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, शिक्रापूर पोलिसांनी आरोपी पती राजू जाधव (वय ३२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे करत आहेत.


