
शासकीय विश्रामगृह, पाळधी येथे पार पडणार आहे.
जळगाव – “नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना” हे ब्रीदवाक्य घेऊन, तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि उद्योजक घडवण्यासाठी पाळधी येथे एका भव्य ‘मोफत उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. जीपीएस (GPS) मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित हा मेळावा गुरुवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता शासकीय विश्रामगृह, पाळधी येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत.जीपीएस मित्र परिवार नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत असतो. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या विविध कर्ज योजना आणि अनुदानाची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने तरुणांना व्यवसाय कसा निवडावा आणि त्यासाठी भांडवल कसे उभारावे, याचे अचूक मार्गदर्शन मिळणार आहे.
या मेळाव्यात बँकिंग आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, सेंट्रल बँक लीड बँक मॅनेजर श्री. डोहरे, बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक प्रविणसिंह, बँक ऑफ बडोदाचे सुनील देशमुख, स्टेट बँकेचे संतोष दराडे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जिल्हा समन्वयक दिपक बोरसे, महा. संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अकृत, पुणेचे राजेंद्र कानडे, जिल्हा उद्योग केंद्राचे आर. आर. डोंगरे,जिल्हा व्यवस्थापक इतर मागासवर्गीय महामंडळचे योगेश पाटील यांच्यासह विविध मान्यवरांचा समावेश आहे.
या मेळाव्यात उपस्थित तरुणांना आणि भावी उद्योजकांना व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने PMEGP आणि CMEGP यांसारख्या सरकारी कर्ज योजनांतून कर्ज मिळवण्याची सोपी पद्धत तसेच जिल्हा उद्योग केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानाची सविस्तर माहिती दिली जाईल. यासोबतच अण्णासाहेब पाटील महामंडळ, इतर मागासवर्गीय महामंडळ आणि ‘अमृत’ योजनेअंतर्गत असलेल्या विविध लाभांची माहिती उपस्थितांना दिली जाणार आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेची भूमिका महत्त्वाची असल्याने, कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आणि बँकेची एकूण कार्यपद्धती कशी असते, यावरही तज्ज्ञ प्रकाश टाकतील. विशेष म्हणजे, बदलत्या काळानुसार सध्या कोणता व्यवसाय निवडणे अधिक फायदेशीर ठरेल, याचे अचूक मार्गदर्शनही या मेळाव्यात मिळणार आहे.


