
घंटागाडी न आल्याने चौकाचौकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरासह नवीन जोशी कॉलनी आणि सम्राट कॉलनी भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कचरा संकलनासाठी येणारी घंटागाडी न आल्याने चौकाचौकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली असून, पुन्हा एकदा महापालिकेच्या आरोग्य विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनपाच्या वतीने नियमितपणे येणारी घंटागाडी गेल्या काही दिवसांपासून या परिसरात येत नसल्याने घरगुती कचरा रस्त्यावर, मोकळ्या जागांमध्ये आणि चौकांमध्ये साचून राहिला आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, माशा, डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
“घंटागाडीच येत नसेल तर नागरिकांनी कचरा टाकायचा कुठे?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी मनपाच्या आरोग्य विभागावर गंभीर आरोप केले आहेत. शहरातील स्वच्छतेबाबत वारंवार दावे केले जात असताना प्रत्यक्षात मात्र या भागात आरोग्याला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाकडे मनपाच्या आरोग्य विभागाने तात्काळ लक्ष देऊन नियमित कचरा संकलन सुरू करावे, तसेच परिसरातील साचलेला कचरा तत्काळ उचलावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.


