
बारावीच्या परीक्षेसाठी चुंचाळेत नवीन केंद्र
यावल तालुक्यातील आठ परिक्षा केंद्रात मंगळवारपासून (दि. १०) बारावीची परिक्षा सुरू होणार आहे. इंग्रजीच्या पहिल्या पेपरला मराठी व उर्दू माध्यमाचे ३ हजार ८३ विद्यार्थी प्रविष्ट असतील. सर्व परिक्षा केंद्रात बैठे पथक तैनात असेल. तसेच भोंगळ कारभार रोखण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. विद्यार्थ्यांना एक तास अगोदर परिक्षा केंद्रात उपस्थित रहावे लागेल. यावल व फैजपूर शहरात प्रत्येकी दोन परिक्षा केंद्र असून ग्रामीण भागात चार असे तालुक्यात ८ केंद्र आहे. यंदा चुंचाळे येथे एक नवीन केंद्र केले असून यावल येथे एक परीक्षा केंद्र बदलण्यात आले आहे. यावल तालुक्यातील ८ परिक्षा केंद्रासाठी दोन कस्टडी आहे.
परीक्षा केंद्र निहाय विद्यार्थी
यावलच्या साने गुरूजी विद्यालयात ४२५, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात ४३५, सांगवीच्या ज्योती विद्या मंदिरात ६७३, चिंचोलीच्या सार्वजनिक विद्यालयात २९२, बामणोदच्या पीएसएमएस हायस्कूलमध्ये २४२, फैजपूरच्या डी. एन. कॉलेजमध्ये २४९, मौलाना आझाद हायस्कूलमध्ये ५२०, चुंचाळेच्या श्रीसमर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक विद्यालयात २४६ विद्यार्थी पेपर देतील.
यावलला कस्टडी प्रमुख म्हणून सरोज पाटील व फैजपूरला कस्टडी प्रमूख म्हणुन संगीता पाटील काम पाहणार आहे. आठ परीक्षा केंद्रात इंग्रजी विषयाचा पेपर ३ हजार ८३ विद्यार्थी देतील. सर्वच परिक्षा केंद्रात केंद्र प्रमुखांनी परीक्षेची आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. परिक्षा कॉपी मुक्त व्हावी यासाठी गस्ती पथक तैनात असेल. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी डॉ. मंजूश्री गायकवाड यांचे परीक्षेवर लक्ष असेल. परिक्षा केंद्राच्या बाहेर यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे व फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
एक केंद्र केले रद्द तर एक वाढले
यंदा तालुक्यातील पश्चिम भागात चुंचाळे गावात श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नवीन परिक्षा केंद्र केले आहे, त्यामुळे स्थानिक तसेच ग्रामीण दुर्गम गावातील, भागातील मुलींना अत्यंत सुलभ परीक्षा केंद्र असेल, साकळी गावातील मुले व मुलींन करिता अत्यंत ये-जाण्यास जवळ चे केंद्र असेल, चुंचाळे केंद्रात तीन कनिष्ठ महाविद्यालयाचा समावेश असेल श्री समर्थ रघुनाथ बाबा कनिष्ठ महाविद्यालय, शारदा कनिष्ठ महाविद्यालय व उर्दू कनिष्ठ महाविद्यालय साकळी यांचा समावेश, २५० ते ३००विद्यार्थी परीक्षार्थी असणार आहेत विशेष म्हणजे पहिल्यांदाच इन कॅमेरा परीक्षा होणार आहे तर यात चुंचाळे, नायगाव, दहीगाव, किनगाव, साकळी, सावखेडा, आडगाव या सर्व शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थींनिंचा समावेश असेल तसेच यावल शहरातील डॉ. जाकीर हुसेन हायस्कूल हे केंद्र रद्द करून इंदीरा गांधी विद्यालयात परिक्षा केंद्र असेल.


