जळगाव प्रतिनिधी । जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर तीन दिवसांपूर्वी घडलेल्या भीषण ‘हिट अँड रन’ अपघाताने शहरात खळबळ उडाली आहे. तंबापुरा भागातील रहिवासी ५० वर्षीय मोहम्मद मूसा शेख यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून, तीन दिवस उलटूनही एमआयडीसी पोलिसांच्या हाती अद्याप आरोपी वाहन किंवा चालक लागलेला नाही. पोलिसांच्या या संथ तपासाबाबत मृताचे नातेवाईक आणि स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेच्या दिवशी मोहम्मद मूसा शेख हे शनीवारी २५ एप्रिल रोजी रस्ता ओलांडत असताना, जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मनराज मोटर्स जवळ एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दुसरीकडे, एमआयडीसी पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे की, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून तपासाची चक्रे फिरवली जात आहेत. लवकरच आरोपीची ओळख पटवून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात येत आहे. मात्र, घटनेला ७२ तास उलटूनही आरोपीचा कोणताही सुगावा न लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
भरधाव वेगातील वाहनाने निष्पाप व्यक्तीचा बळी घेतला, परंतु कायद्याचा हात अद्याप आरोपीपर्यंत पोहोचलेला नाही. मृताच्या कुटुंबीयांनी आरोपीला त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता एमआयडीसी पोलीस या हिट अँड रन प्रकरणाचा उलगडा नेमका कधी करतात आणि आरोपीला कधी जेरबंद करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रस्ते अपघातांच्या वाढत्या घटना पाहता, या प्रकरणातील निष्कर्षावर प्रशासनाची जबाबदारी दिसून येईल.



