चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरालगतच्या खडकी बायपास परिसरात एका किरकोळ वादाचे पर्यावसान भीषण हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यात पडलेल्या वाळूवरून बैलगाडी नेल्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील सदस्यांवर लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मीक पांडुरंग जाधव (वय ४७) हे १२ मे रोजी सकाळी आपल्या बैलगाडीने शेतातून चारा घेऊन घरी परतत होते. वाटेत रस्त्यावर पसरलेल्या रेतीवरून त्यांची बैलगाडी गेल्याने स्थानिक आरोपींनी त्यांना अडवले. साध्या वादातून सुरू झालेल्या या प्रकरणाला आरोपींनी हिंसक वळण दिले.
हा वाद विकोपाला गेल्यावर आरोपींनी लोखंडी रॉडने जाधव कुटुंबावर हल्ला चढवला. यात वाल्मीक यांचा मुलगा धर्मराज याच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर वार झाले असून तो रक्तबंबाळ झाला. केवळ पुरुषच नव्हे, तर घरातील महिला आणि मुलीलाही आरोपींनी सोडले नाही. त्यांनाही बेदम मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली.
याप्रकरणी वाल्मीक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक अर्जुन केदार, आबा अशोक केदार, प्रकाश अशोक केदार, कल्पना आबा केदार, रत्ना अशोक केदार आणि रेखाबाई प्रकाश केदार या सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.



