मुंबई प्रतिनिधी | इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ लागला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाचे सतत होणारे मूल्यपतन यामुळे केंद्र सरकारने अखेर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. हे नवे दर आजपासून लागू झाले असून, मुंबईत पेट्रोलचा दर १०६.५० रुपये, तर डिझेल ९३ रुपयांवर पोहोचले आहे.
युद्धाचा अर्थव्यवस्थेला विळखा :
इराण-अमेरिका संघर्षात ‘होर्मुज खाडी’ बंद असल्याने एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. भारताकडून इंधन टंचाई टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असले, तरी आंतरराष्ट्रीय दबावामुळे सरकारला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने नुकतीच साखरेच्या निर्यातीवरही बंदी घातली आहे.
पंतप्रधानांचे देशवासीयांना आवाहन :
देशाची आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे. “येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलचा वापर जास्तीत जास्त कमी करावा, तसेच देशातील परकीय चलन साठा वाचवण्यासाठी किमान एक वर्ष सोने खरेदी करू नये,” असे त्यांनी म्हटले आहे. सोन्याच्या वाढत्या भावानंतर आता थेट इंधन दरवाढ झाल्याने मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले आहे.
वाहतूकदारांच्या भाडेवाढीचे संकेत :
इंधन दरवाढीचा परिणाम आता जीवनावश्यक वस्तूंवरही होण्याची शक्यता आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे टॅक्सी आणि रिक्षा संघटनांनी भाडेवाढ करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासासाठी आता जादा पैसे मोजावे लागणार असून, महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



