जळगाव प्रतिनिधी । क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून एका १२ वर्षीय निष्पाप बालकाचा छातीत बॅट मारून खून करण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. गणेश नवल पाटील असे मृत बालकाचे नाव असून, ही घटना धरणगाव तालुक्यातील रेल गावात घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी पीडित वडील गेल्या दीड महिन्यापासून पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र पोलिसांनी अद्याप तक्रार नोंदवून न घेतल्याने हताश झालेल्या बापाने थेट पाळधी पोलीस ठाण्यापासून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयापर्यंत न्यायासाठी पायपीट केली.
दीड महिन्यापूर्वी रेल येथील रहिवासी नवल पाटील यांचा मुलगा गणेश गावातील मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळताना मुलांमध्ये वाद झाला आणि याच वादातून गणेशसोबत खेळणाऱ्या एका मित्रानेच त्याच्या छातीत जोरात क्रिकेटची बॅट मारली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला, असा गंभीर आरोप वडिलांनी केला आहे. घटनेच्या वेळी कुटुंबाला ‘मुलगा चक्कर येऊन पडल्याने मरण पावला’ असे खोटे सांगण्यात आले होते. मानसिक धक्क्यात असलेल्या पालकांनी शवविच्छेदन (Postmortem) न करताच मुलावर अंत्यसंस्कार केले. मात्र, नंतर गावात चौकशी केली असता मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून छातीत बॅट मारल्यामुळेच झाल्याचे सत्य समोर आल्याचा दावा वडिलांनी केला आहे.
पोलीस प्रशासनावर असहकार्याचा आरोप
सत्य समजताच नवल पाटील यांनी पाळधी पोलिसात धाव घेतली, परंतु गेल्या दीड महिन्यापासून पोलीस तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. डोळ्यात अश्रू आणि हातात मृत मुलाचा फोटो घेऊन शेवटी नवल पाटील जळगाव एसपींच्या दारात पोहोचले. यावर बोलताना पीडित वडील म्हणाले, “आम्हाला सुरुवातीला फसवण्यात आले. आता सत्य समोर येऊनही पोलीस तक्रार घेत नाहीत. एसपी साहेबांना विनंती आहे की माझ्या मुलाला न्याय द्यावा.”
पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया आणि पुढील तपास
या संवेदनशील प्रकरणावर जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी सांगितले की, “गणेश पाटील या बालकाच्या मृत्यू प्रकरणी वडिलांचे लेखी निवेदन मिळाले असून, पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीत तथ्य आढळल्यास दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.” घटनेच्या वेळी शवविच्छेदन झाले नसल्यामुळे पोलिसांसमोर या तपासाचे मोठे आव्हान असणार आहे.



