जळगाव प्रतिनिधी | गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा कमालीचे तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळापासून रखडल्यामुळे, २०२२ पासून या कोट्यातील विधानपरिषदेच्या जागा प्रलंबित होत्या. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्याने, या जागेची निवडणूक होणार की नाही, याबाबत मोठा संभ्रम होता. मात्र, निवडणूक आयोगाने जळगावसह राज्यातील १६ जागांसाठी निवडणूक जाहीर करून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मतदानाचा हक्क कोणाला असेल, याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. जळगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर सध्या प्रशासक राजवट असल्याने, यावेळच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींना मतदानाचा हक्क नसेल. याउलट, जिल्ह्यातील नवनियुक्त नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष या निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावतील.
या जागेवर यापूर्वी चंदूलाल पटेल हे विधानपरिषदेवर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत होते. आता आगामी निवडणुकीत महायुतीकडून पुन्हा त्यांनाच संधी मिळते की पक्षाकडून एखादा नवा चेहरा मैदानात उतरवला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याचे जिल्ह्यातील राजकीय संख्याबळ पाहता, महायुतीकडे स्पष्ट आणि निर्णायक बहुमत दिसून येत आहे. त्यामुळे या जागेवर महायुतीचा विजय सुकर मानला जात असला, तरी प्रत्यक्ष निवडणुकीत काय घडामोडी घडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या जागेसाठी आगामी १८ जून रोजी मतदान होणार असून, २२ जून रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल. या घोषणेमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.



