जळगाव प्रतिनिधी । आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे एका विशेष समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला पोलीस प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य, महावितरण, अग्निशमन, पशुसंवर्धन आणि परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. आगामी सण शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेत आवश्यक सूचना यावेळी देण्यात आल्या.
सणाच्या काळात जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. शहर व जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, यामध्ये एसआरपीएफ जवान आणि होमगार्ड पथकांचा समावेश असेल. संवेदनशील भागांत, प्रमुख चौकांमध्ये आणि धार्मिक स्थळांजवळ गस्त वाढवण्यात आली आहे. समाजकंटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘गुड मॉर्निंग स्क्वॉड’ अलर्ट मोडवर असून संशयितांना आधीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच, विविध ठिकाणी चेक नाके सक्रिय करून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
या बैठकीत गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले. गोवंश हत्या हा गंभीर गुन्हा असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मुस्लिम बांधवांसाठी विशेष नियमावली जाहीर करण्यात आली असून, उघड्यावर कत्तल किंवा मांस विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच, तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या किंवा गरोदर जनावरांची कत्तल करू नये आणि केवळ टॅग केलेल्या जनावरांचाच वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.
स्वच्छतेच्या दृष्टीने महानगरपालिकेला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. कत्तलीनंतर गोळा होणाऱ्या कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी जास्तीत जास्त ट्रॅक्टर्सची व्यवस्था करावी, हे ट्रॅक्टर्स वरून व खालून काळ्या मेणकापडाने पूर्णपणे झाकलेले असावेत, जेणेकरून कुठेही रक्त वाहणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोशल मीडियावरील अफवांवर सायबर सेलचे विशेष लक्ष असणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सलोखा राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



