जळगाव प्रतिनिधी | महावितरण कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणाची जुन्या वादातून निर्घृण हत्या करून नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य संशयित आरोपीला जळगाव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आमीन हैदर तडवी (वय २१, रा. हरिविठ्ठलनगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात यापूर्वीच पोलिसांनी पाच आरोपींना गजाआड केले आहे, मात्र आमीन हा गुन्हा घडल्यापासून पोलिसांना चकवा देऊन फरार होता.
जुना वाद आणि थरारक हत्याकांड :
मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनीतील रहिवासी विशाल मोची (वय २६, उर्फ विक्की रमेश मोची) हा तरुण १७ ऑगस्ट २०२५ रोजी त्याच्या मित्रांसह खंडित वीजपुरवठ्याची तक्रार देण्यासाठी दीक्षितवाडीतील महावितरण कार्यालयात गेला होता. याच ठिकाणी त्याचा वाढदिवस साजरा केला जात होता. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या संशयितांशी जुन्या वादावरून त्याचा जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि संशयितांनी विशाल मोची याची धारदार शस्त्रांनी हत्या केली होती. याप्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुण्याहून जळगावात येताच पोलिसांनी घेरले
गुन्हा घडल्यापासून आमीन तडवी हा अटकेच्या भीतीने पुण्यात नाव बदलून लपून राहत होता. नऊ महिने त्याने पोलिसांना गुंगारा दिला. परंतु, नुकताच तो आपल्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी गुपचूप जळगावात आल्याची गोपनीय माहिती रामानंदनगर पोलिसांच्या गस्ती पथकाला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. सुशील चौधरी, सुधाकर अंभोरे आणि सागर देवरे यांच्या पथकाने तातडीने हालचाली करत आमीनला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



