जळगाव प्रतिनिधी । वाढती इंधन टंचाई आणि पर्यावरणाचा ढासळता समतोल राखण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. पालिकेने दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आज पहिल्याच दिवशी त्याची यशस्वी अंमलबजावणी झाली. या मोहिमेचे नेतृत्व स्वतः महापौर दीपमाला मनोज काळे यांनी केले. त्यांनी घरातून थेट मनपा कार्यालयापर्यंत सायकल चालवत प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर एक अनोखा आदर्श ठेवला.
जागतिक पातळीवरील इंधन संकट आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता, महापौरांनी आयुक्तांना यासंदर्भात लेखी आदेश दिले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज संपूर्ण पालिका प्रशासन पर्यावरणपूरक रंगात रंगलेले दिसले. उपमहापौर आणि उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी ई-बाईकचा वापर केला. तर उपायुक्त धनश्री शिंदे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी थेट पायी चालत कार्यालय गाठले. गटनेते विष्णू भाऊ यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी ‘कार आणि बाईक शेअरिंग’चा सुजाण पर्याय निवडला.
“पर्यावरण संरक्षण ही केवळ घोषणा न राहता ती काळाची गरज बनली आहे. प्रशासनाने स्वतःपासून सुरुवात केल्यास नागरिकांमध्येही सकारात्मक संदेश जाईल,” असा विश्वास महापौर दीपमाला काळे यांनी यावेळी व्यक्त केला. या उपक्रमांतर्गत दर बुधवारी कर्मचाऱ्यांना सायकल, ई-वाहने किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. केवळ जळगाव पालिकेपुरता मर्यादित न राहता, हा उपक्रम संपूर्ण शहरासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी चिन्हे आहेत. आगामी काळात या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



