जळगाव प्रतिनिधी । देशात सातत्याने वाढणारी महागाई, बेरोजगारी आणि वीज ग्राहकांच्या माथी मारले जाणारे स्मार्ट मीटर या जनविरोधी धोरणांविरोधात ‘बहुजन मुक्ती पार्टी’ने थेट रस्त्यावर उतरून देशव्यापी रणशिंग फुंकले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून, जळगाव जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील काशिनाथ देवरे यांच्या नेतृत्वाखाली जी.एस. मैदानात थेट ‘चूल पेटवा’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर हल्लाबोल करताना बहुजन मुक्ती पार्टीने निवेदनात म्हटले आहे की, “स्मार्ट मीटरच्या नावाखाली खाजगी कंपन्यांकडून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनप्रमाणेच (EVM) बेकायदेशीरपणे ग्राहकांची लूट सुरू आहे. यामुळे सर्वसामान्यांचे वीज बिल भरमसाट वाढले असून जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.” याशिवाय, घरगुती गॅस सिलिंडरचे दर १५०० ते २००० रुपयांवर, तर व्यावसायिक गॅसचे दर २५०० ते ३५०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्य आणि छोटे व्यावसायिक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
प्रमुख मागण्यांवर आंदोलक ठाम:
वादग्रस्त स्मार्ट मीटर योजना त्वरित बंद करून पारदर्शक मीटर बसवावेत. घरगुती गॅस सिलिंडर ४०० रुपयांत, तर व्यावसायिक सिलिंडर ७०० रुपयांत द्यावा. पेट्रोलचे दर ९० रुपये आणि डिझेलचे दर ८० रुपये प्रति लीटर करावेत. वीज बिल थकल्यास थेट वीज पुरवठा खंडित करणाऱ्या खाजगी कंपन्यांवर कडक कारवाई व्हावी.
देशातील ६२५ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन तीन टप्प्यांत राबवले जात आहे. यापूर्वी १२ मे रोजी ‘लालटेन भेट’ आंदोलनाने पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली होती. आज, २० मे रोजी दुसऱ्या टप्प्यात ‘चूल पेटवून’ गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. आता आगामी ३१ मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात ‘दे धक्का’ आंदोलन करून सरकारला तीव्र इशारा देण्यात आला आहे.



