जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील रेणुका नगर येथे एक धक्कादायक आणि अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आई-वडील घराबाहेर गेले असताना, घरात एकट्याच असलेल्या पियुष प्रकाश वाणी (वय २०) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पियुष हा आपल्या माता-पित्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या या टोकाच्या पावलामुळे वाणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पियुष वाणी हा आपल्या कुटुंबासह रेणुका नगरात राहत होता. बुधवारी सकाळच्या सुमारास त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो दवाखान्यात गेला होता. उपचार घेऊन आल्यानंतर तो घरातच आराम करत होता. दुपारच्या सुमारास पियुषच्या वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी त्याच्या आईला सुभाष चौकात जायचे होते. पियुष घरात झोपलेला असल्याने आईने घराला बाहेरून कडी लावली आणि त्या डबा देण्यासाठी निघून गेल्या.
आई घरी परतताच समोर आले भयंकर दृश्य
काही वेळानंतर डबा देऊन जेव्हा आई पुन्हा घरी परतली, तेव्हा तिने दरवाजा उघडला. घरात प्रवेश करताच पियुषने छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत तिला दिसून आला. एकुलत्या एक मुलाला या अवस्थेत पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने हंबरडा फोडत केलेला आक्रोश ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घराकडे धाव घेतली.
नागरिकांच्या मदतीने पियुषला तात्काळ खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. पियुषच्या मृत्यूची बातमी समजताच जिल्हा रुग्णालयात त्याच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता.
पियुषने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.



