जळगाव प्रतिनिधी | नशिराबाद नगरपरिषद स्थापन होऊन जवळपास ६ वर्षे पूर्ण झाली असली, तरी गॅस वितरण प्रणालीत या भागाला अजूनही ग्रामीण निकष लावले जात असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, नशिराबादचे उपनगराध्यक्ष पंकज शामकांत महाजन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले आणि नशिराबादला तातडीने शहरी निकष लागू करण्याची मागणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारच्या गॅस वितरण प्रणालीनुसार ग्रामीण भागासाठी गॅस रिफिल बुकिंगचा कालावधी ४५ दिवसांचा निश्चित करण्यात आला आहे. याउलट, शहरी भागातील नागरिकांना अवघ्या २५ दिवसांत गॅस रिफिल बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. नशिराबादचे रूपांतर आता ग्रामीण भागातून शहरी भागात झाले असून, येथील लोकसंख्या आणि गरजा वाढल्या आहेत. मात्र, अद्यापही येथील गॅस ग्राहकांना सरसकट ४५ दिवसानंतरच सिलेंडर बुकिंग करण्याची सक्ती केली जात आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या किंवा टंचाईच्या काळात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी मागणी केली आहे की, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या सर्व प्रमुख गॅस वितरण कंपन्यांना नशिराबाद शहराची ‘शहरी क्षेत्र’ म्हणून नोंद घेण्याचे आदेश द्यावेत. नशिराबादमधील नागरिकांना शहरवासीयांप्रमाणेच २५ दिवसांच्या मर्यादेत गॅस रिफिलिंगचा लाभ मिळावा, जेणेकरून गॅस टंचाईच्या समस्येपासून त्यांची मुक्तता होईल.
या निवेदनावर उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांच्यासह भूषण भानुदास, संदीप विष्णू पाटील, रवींद्र संतोष चौधरी, निवृत्ती वासुदेव, राहुल चौधरी आणि वैभव संजय गोसावी आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नशिराबादवासीयांकडून केली जात आहे.



