जळगाव प्रतिनिधी | आजच्या वाढत्या खर्चिक व बडेजावाच्या विवाह पद्धतीला फाटा देत समाजाला नवी दिशा देणारा आणि साधेपणा, सामाजिक एकता तसेच धार्मिक मूल्यांचा सुंदर संदेश देणारा चौथा सामूहिक विवाह सोहळा रविवारी (२४ मे २०२६) रोजी येथील मन्यार हॉलमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण व पवित्र वातावरणात संपन्न झाला. ‘शिसगर मुस्लिम समाज फाउंडेशन’ (सुप्रिम कॉलनी, जळगाव) यांच्या वतीने या आदर्श उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सामूहिक विवाह सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विवाहबंधनात अडकलेल्या चार जोडप्यांमध्ये दोन मनीयार बिरादरी, एक शिकलगर बिरादरी आणि एक पटेल बिरादरीच्या वधू-वरांचा समावेश होता. विशेष म्हणजे, एका जोडप्यामध्ये वधू आणि वर दोघे वेगवेगळ्या बिरादरीतील असूनही इस्लामी शरियतच्या पवित्र मार्गदर्शनानुसार त्यांचा निकाह लावला गेला. यातून समाजात बिरादरी किंवा जातीपातीपेक्षा इस्लामी बंधुभाव आणि मानवी एकतेलाच अधिक महत्त्व दिले पाहिजे, असा अत्यंत सकारात्मक व क्रांतीकारी संदेश देण्यात आला.
सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख म्हणाले की, “आजच्या युगात अनावश्यक खर्च, भपकेबाज प्रदर्शन आणि हुंड्याच्या जाचक प्रथेमुळे अनेक गरीब कुटुंबांवर प्रचंड आर्थिक ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी प्रत्येक गाव, खेडे आणि तालुक्यात अशा प्रकारचे सामूहिक विवाह आयोजित करणे ही काळाची गरज बनली आहे. समाजाने साखरपुड्याच्याच कार्यक्रमात विवाह उरकण्याची नवी आणि सोपी परंपरा सुरू करावी.” पुढे बोलताना त्यांनी आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदेपालनाचे आवाहन केले. महाराष्ट्र शासनाने गोवंश कुर्बानीवर बंदी घातलेली असल्याने सर्वांनी कायद्याचा सन्मान राखावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी सना शेख व अन्सार बेग, मुस्कान मनियार व शेख शादाब, सानिया बी शिकलगार व शब्बीर खान, आणि फरीन नाझ व समीर पटेल यांचा निकाह भुसावळचे मौलाना अलीम रजा व मौलाना मोहम्मद यांनी पढविला. कार्यक्रमाला मुक्ताईनगरचे नगरसेवक सुरेशभाऊ भापसे, रवीभाऊ सोनवणे, बाळादादा सोनवणे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शेख तनवीर सर यांनी केले, तर आभार डॉ. फिरोज शेख यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.



