जळगाव प्रतिनिधी | जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, महाविकास आघाडीने आपला उमेदवार निश्चित केला आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटली असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद तायडे यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे.
या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला चांगलीच चुरस पाहायला मिळत होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून दिलीप खोडपे, तर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाकडून शरद तायडे या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाकडे जाणार, याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र, पक्षांतर्गत वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर अखेर शरद तायडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद तायडे यांनी निवडणुकीच्या मैदानात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
महायुतीत अद्याप संभ्रम; बड्या नेत्यांच्या मुलांची नावे चर्चेत
एकीकडे महाविकास आघाडीने आपला उमेदवार निश्चित केला असताना, दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये मात्र उमेदवारीवरून अद्यापही सस्पेन्स कायम आहे. महायुतीमधील जागावाटप आणि निश्चित उमेदवार कोण, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
तथापि, संभाव्य उमेदवारांमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र आहे:
शिवसेना (शिंदे गट): जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांचे नाव आघाडीवर असून, त्यांनी उमेदवारी अर्जही घेतला आहे.
भारतीय जनता पक्ष (भाजप): माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची कन्या केतकी पाटील यांनी देखील भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.
अर्ज खरेदी मात्र दाखल अजून नाही
विशेष म्हणजे, महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख दावेदारांनी निवडणूक कार्यालयातून उमेदवारी अर्ज खरेदी केले असले, तरी अद्यापपर्यंत एकाही प्रमुख उमेदवाराने आपला अर्ज अधिकृतपणे दाखल केलेला नाही. त्यामुळे महायुती कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करते आणि अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय समीकरणे काय वळण घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
”महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवेन. जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि महाविकास आघाडीची ताकद विधान परिषदेत वाढवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने जिंकू.”



