जळगाव प्रतिनिधी |:व अमळनेर येथील अवघ्या तीन महिन्यांच्या एका बालिकेवर जळगावच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञांनी यशस्वी उपचार करून तिला नवजीवन दिले आहे. गंभीर अवस्थेत व्हेंटीलेटरवर दाखल झालेल्या या चिमुरडीची प्रकृती १० दिवसांच्या अथक उपचारांनंतर आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे.
अमळनेर येथील मोनीस हारून शेख यांच्या तीन महिन्यांच्या बालिकेला तीव्र ताप आणि वारंवार झटके येत असल्याने धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची स्थिती चिंताजनक बनल्याने तिला कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेवर (व्हेंटीलेटर) ठेवून पुढील उपचारांसाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले.
रुग्णालयातील एनआयसीयू व पीआयसीयू विभागाचे तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीरवार आणि डॉ. उमाकांत अणेकर यांनी तात्काळ बालिकेची तपासणी केली. पाठीतील पाण्याचे परीक्षण, मेंदूचा एमआरआय आणि रक्त चाचण्यांद्वारे तिला ‘एनसेफेलायटीस’ (मेंदूची सूज) हा अत्यंत गंभीर आजार झाल्याचे अचूक निदान झाले. यानंतर डॉ. ओमश्री गुडे, डॉ. कुशल धांडे, डॉ. विशाल कोठावडे, डॉ. नवेद खान यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय आणि परिचारिका टीमने उपचार सुरू करून औषधांचा योग्य डोस दिला.
विशेष म्हणजे, या बालिकेवर ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’अंतर्गत पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले. यामुळे गरीब कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला. या प्रक्रियेत हिरामण लांडगे यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्यास सहकार्य केले.
कोट:
“बालिका अत्यंत गंभीर अवस्थेत आली होती. अचूक निदानानंतर आमच्या टीमने केलेल्या समन्वित प्रयत्नांमुळे तिला वाचवण्यात यश आले. लहान मुलांमध्ये तापासोबत झटके आल्यास पालकांनी वेळ न दवडता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.”
– डॉ. नवेद खान, बालरोग तज्ज्ञ.



