जळगाव प्रतिनिधी | श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्वामी समर्थांची पवित्र पालखी व पादुका परिक्रमा येत्या ७ जून रोजी जळगाव नगरीत दाखल होत आहे. यंदा या पालखी सोहळ्याचे जळगावातील विसावे वर्ष असून, स्वामी भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या वतीने दरवर्षी या भव्य परिक्रमेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा अशा तीन राज्यांमध्ये सुमारे सहा महिने हा पालखी सोहळा मार्गस्थ असतो. परगावच्या भाविकांना श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा प्रत्यक्ष लाभ मिळावा आणि अक्कलकोट येथे मंडळाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भव्य प्रसादालय व भक्तनिवासाच्या उभारणीला हातभार लागावा, या उदात्त हेतूने ही परिक्रमा काढली जाते.
जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरातील स्वामीभक्त सुकदेव शिरसाळे यांच्याकडे गेल्या १९ वर्षांपासून या पालखीच्या स्वागताचा आणि आदरातिथ्याचा मान मिळत असून, यंदाचे हे विसावे वर्ष आहे. ७ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गणेशवाडी येथील श्री रामदेवबाबा मंदिराजवळ पालखीचे भव्य आगमन होईल. तेथून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात पालखी मिरवणूक सुकदेव शिरसाळे यांच्या निवासस्थानी पोहोचेल.
दुपारी १२ वाजेच्या सुमारास स्वामींच्या पादुकांवर विधीवत अभिषेक आणि महाआरती संपन्न होईल. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या पवित्र पुरुषोत्तम मास (अधिक महिना) सुरू असल्याने या काळात स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेणे अत्यंत फलदायी मानले जाते. तरी सर्व स्वामी भक्तांनी या अपूर्व सोहळ्याला उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



