भुसावळ प्रतिनिधी | जळगाव विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. एकीकडे शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेशमा काळे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत एक नवा आणि अनपेक्षित ‘ट्विस्ट’ निर्माण झाला असतानाच, दुसरीकडे भुसावळचे माजी नगराध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत आपलाच विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास अनिल चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका लावत अनिल चौधरी यांनी आज वरणगाव नगर परिषदेला भेट दिली. यावेळी त्यांनी वरणगाव येथील सर्व नगरसेवकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले. नगरसेवकांशी संवाद साधताना चौधरी यांनी त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रदीर्घ अनुभवाचा दाखला दिला.
”माझ्याकडे सार्वजनिक जीवनाचा आणि नगर परिषदेमधील कामाचा तब्बल ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. या अनुभवाच्या आणि लोकसंपर्काच्या जोरावर मी या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवून आणू शकतो. मतदारांचा माझ्यावर आणि माझ्या कामावर पूर्ण विश्वास असून, या निवडणुकीत मीच विजयी होणार,” अशी प्रतिक्रिया अनिल चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
सध्या जळगाव विधान परिषद निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या आणि राजकीय गणिते वेगाने बदलत आहेत. मात्र, कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी मतदारांशी थेट संपर्क साधत प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. त्यांच्या या झंझावाती दौऱ्यामुळे आणि वाढत्या पाठिंब्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, ही निवडणूक आता अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.



