पाचोरा, प्रतिनिधी | प्रशासकीय कामाच्या गडबडीत महत्त्वाच्या वस्तू गहाळ होण्याच्या घटना अनेकदा घडतात, मात्र समाजातील प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचे एका घटनेने दाखवून दिले आहे. पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित ‘जनसमाधान अभियाना’दरम्यान एका नागरिकाचा हरवलेला महागडा मोबाईल एका पत्रकाराच्या प्रामाणिकपणामुळे सुखरूप परत मिळाला आहे. पत्रकार जाविद शेख यांच्या या संवेदनशील आणि प्रामाणिक कृत्याचे पाचोरा तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील रहिवासी योगेश पाटील हे ११ जून रोजी आपल्या काही समस्या घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयात आले होते. तिथे सुरू असलेल्या जनसमाधान अभियानात अर्ज भरण्याच्या गडबडीत त्यांचा मोबाईल अनावधानाने एका ठिकाणी विसरला. अर्ज जमा करून निघाल्यानंतर त्यांना मोबाईल जवळ नसल्याचे लक्षात आले. त्यांनी संपूर्ण कार्यालय परिसर पिंजून काढला, मात्र मोबाईल कुठेही आढळून आला नाही. मौल्यवान डेटा आणि संपर्क क्रमांक असलेला मोबाईल हरवल्याने योगेश पाटील अत्यंत चिंतेत पडले होते.
दरम्यान, पाचोरा येथील पत्रकार जाविद शेख हे या अभियानाचे वृत्तांकन (रिपोर्टिंग) करण्यासाठी तिथे आले होते. कार्यालय परिसरात त्यांना हा मोबाईल बेवारस अवस्थेत पडलेला आढळला. कोणत्याही मोहाला बळी न पडता, जाविद शेख यांनी तात्काळ तो मोबाईल सुरक्षित ताब्यात घेतला आणि थेट पाचोरा पोलीस ठाणे गाठून पोलिसांकडे जमा केला.
काही वेळातच आपला मोबाईल पोलिसांकडे असल्याची माहिती योगेश पाटील यांना मिळाली. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आवश्यक ती कायदेशीर शहानिशा केल्यानंतर, पत्रकार जाविद शेख यांच्याच हस्ते तो मोबाईल मूळ मालक योगेश पाटील यांच्या स्वाधीन केला. आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने पाटील यांच्या जीवात जीव आला. त्यांनी पत्रकार जाविद शेख यांचे जाहीर आभार मानले, तर पोलिसांनीही शेख यांच्या या प्रामाणिकपणाची पाठ थोपटली आहे.



