रावेर प्रतिनिधी | रावेर शहर आणि परिसरातील सामाजिक सलोखा व एकोपा अबाधित राखण्यासोबतच गुंडगिरी करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करणे आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करणे, याला आपले प्रथम प्राधान्य राहील, अशी ग्वाही नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेतून बदली झाल्यानंतर त्यांनी नुकताच रावेर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला.
पदभार स्वीकारताच संदीप पाटील यांनी आपल्या आक्रमक भूमिकेचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. मूळचे धुळे जिल्ह्यातील असलेले संदीप पाटील यांना पोलीस दलातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी गडचिरोली, नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), नंदुरबार, जळगाव एलसीबी आणि पिंपळगाव बसवंत अशा विविध संवेदनशील व महत्त्वपूर्ण विभागांमध्ये आपल्या कर्तव्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या याच कर्तव्यदक्षतेच्या पार्श्वभूमीवर आता त्यांच्याकडे रावेर सारख्या संवेदनशील पोलीस ठाण्याची धुरा सोपवण्यात आली आहे.
नव्या पोलीस निरीक्षकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे परिसरातील गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर कृत्ये आणि अवैध व्यवसाय कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड दम त्यांनी दिला आहे.
सध्या संपूर्ण रावेर शहरात पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याच नावाची आणि कार्यपद्धतीची चर्चा रंगली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत रावेर शहरात झालेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास अद्याप प्रलंबित आहे. या गुन्ह्यांची उकल करून चोरट्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान नव्या पोलीस प्रमुखांसमोर असणार आहे. मात्र, पाटील यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा होऊन शहरातील गुन्हेगारीला लगाम बसेल आणि नागरिक सुरक्षित राहतील, असा विश्वास रावेरकरांमधून व्यक्त होत आहे.



