यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील कोळन्हावी परिसरात घडलेल्या एका संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा छडा लावत यावल पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत खुनाचा उलगडा करून तीन आरोपींना अटक केली आहे. सुरुवातीला हा प्रकार रस्ते अपघात असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या बारकाईच्या तपासातून हा अपघात नसून नियोजित खून असल्याचे समोर आले.
या बाबत अधिक माहिती अशी की, 18 जून रोजी पहाटे पवन रवींद्र सोळंके (वय 26, रा. कोळन्हावी) याचा मृतदेह रस्त्यावर आढळला होता. मृताच्या मित्रांनी ट्रकच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र घटनास्थळी अपेक्षित प्रमाणात रक्त न सापडणे आणि इतर काही बाबी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू केला.
फॉरेन्सिक तपास, घटनास्थळाची पाहणी, तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. दारूच्या नशेत झालेल्या वादातून पवन सोळंके याच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा कट्टा मारून त्याचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रस्त्यावर नेऊन अपघाताचा बनाव रचण्यात आला होता.
या प्रकरणी उमेश दिलीप परदेशी (रा. कोळन्हावी), चेतन मोतीराम कोळी (रा. डांभुर्णी) आणि लोकेश दिवाकर महाजन (रा. डांभुर्णी) या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत बजाज, पोलीस निरीक्षक रंजनाथ धारबळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या उल्लेखनीय तपासामुळे यावल पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.



