जामनेर-प्रतिनिधी । शासकीय योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचे पुढील अनुदान मिळवून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जामनेर पंचायत समितीच्या कंत्राटी तांत्रिक सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) असे लाच मागणी करणाऱ्या लोकसेवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळ तक्रारदार यांची जामनेर शिवारात शेती असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (सन २०२१-२२ व २०२२-२३) त्यांची सिंचन विहीर मंजूर झाली होती. या विहिरीची स्थळपाहणी करण्यापूर्वीच सागर नावकर याने रोजगार सेवकामार्फत तक्रारदाराकडून ३० हजार ३०० रुपये स्वीकारले होते व स्थळपाहणी करून फोटो काढले होते. त्यानंतर तक्रारदाराला वेळोवेळी एकूण ६० हजार ९६६ रुपयांचे अनुदान मिळाले. उर्वरित अनुदान मिळवण्यासाठी तक्रारदाराने जेव्हा सागर नावकरची भेट घेतली, तेव्हा त्याने “तुम्ही विहिरीचे ठिकाण बदलले आहे, त्यामुळे पैसे मिळणार नाहीत. पुढील अनुदान हवे असेल तर ३० हजार रुपये द्यावे लागतील,” अशी धमकीवजा लाच मागितली.
याप्रकरणी तक्रारदाराने ६ एप्रिल रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने ६ एप्रिल, ९ एप्रिल आणि १४ मे २०२६ रोजी लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान, पंचांसमक्ष सागर नावकर याने ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्याच्याविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई :
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे आणि त्यांच्या पथकाने केली. कोणत्याही लोकसेवकाने लाच मागितल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



