जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असून पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. २९, ३० जून तसेच २ जुलै रोजी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, १, ३, ४ आणि ५ जुलै रोजीही जिल्ह्यात पावसाची उपस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २३ जूनपासून जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्याने अनेक भागांत पावसाची हजेरी लागली आहे.
दरम्यान, पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आवश्यक असल्यास स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
पुढील काही दिवस हवामानात सातत्याने बदल होण्याची शक्यता असल्याने शेतकरी, नागरिक तसेच प्रवाशांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे. विशेषतः वीजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.



