जळगाव प्रतिनिधी | लग्नाच्या आनंदावर अवघ्या सहा दिवसांतच दु:खाची काळी छाया पसरल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी जळगाव शहरात घडली. विद्यापीठासमोर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २१ वर्षीय नवविवाहिता वैशाली भाऊसाहेब पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) हिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात तिचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वैशाली पाटील यांचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील गुजरात पेट्रोल पंप परिसरातील देवराम नगर येथे वास्तव्यास असलेले पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवदांपत्य देवदर्शनासाठी गेले होते आणि काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते.
सोमवारी वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका प्रवीण सूर्याजी पाटील वय २१ कोळपिंप्री, ता. अमळनेर) हे जळगाव येथे आले होते. दुपारचे जेवण आटोपल्यानंतर दोघेही दुचाकीने कोळपिंप्रीकडे निघाले. दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास ते विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तर काका प्रवीण पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच सासरचे व माहेरचे नातेवाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. नवविवाहितेच्या अकाली निधनामुळे रुग्णालय परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेला संसार क्षणार्धात उद्ध्वस्त झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.



