पाळधी प्रतिनिधी | मतदार यादी विशेष पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाला पाळधी परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक येथे आयोजित विशेष शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत आपली एसआयआर प्रक्रिया पूर्ण केली. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला गती मिळाली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी खुर्द येथील शासकीय विश्रामगृह आणि पाळधी बुद्रुक येथील श्रीराम मंदिर परिसरातील शिबिरांना भेट देत कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रत्येक पात्र मतदाराने वेळेत एसआयआर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले. लोकशाही बळकट करण्यासाठी अचूक व अद्ययावत मतदार यादी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवा नेते प्रतापराव पाटील दिवसभर शिबिरांमध्ये उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक कागदपत्रे, अर्ज भरणे, पडताळणी आणि इतर प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करत होते. बीएलओ आणि बीएलए यांच्या समन्वयातून नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडविण्यात आल्या. शिवसेना, युवासेना आणि जीपीएस मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनीही नागरिकांना प्रत्येक टप्प्यावर सहकार्य केले. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
पाळधी परिसरात आतापर्यंत सुमारे ४० ते ५० टक्के एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली असून, २५ जुलैपूर्वी शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घराघरांत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान, ज्या नागरिकांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांच्यासाठी १६ जुलै रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून एसआयआर प्रक्रिया पूर्ण करून आपला मतदानाचा घटनात्मक हक्क सुरक्षित ठेवावा, असे आवाहन प्रतापराव पाटील यांनी केले.



