जळगाव प्रतिनिधी | धरणगाव-जळगाव मार्गावरील श्री स्वामी समर्थ फ्लोअर मिलजवळ शुक्रवारी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास एसटी बस, आयशर आणि खडीने भरलेल्या ट्राला यांच्यात भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वाहन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. धडकेनंतर खडीने भरलेला ट्राला रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
शिरपूर आगाराची एमएच-20 बीएल-2736 क्रमांकाची एसटी बस जळगावहून शिरपूरकडे जात होती. त्याच मार्गावर खडीने भरलेला ट्राला धरणगावच्या दिशेने जात असताना, एमएच-18 बीझेड-3232 क्रमांकाचा आयशर धरणगावहून जळगावकडे येत होता. श्री स्वामी समर्थ फ्लोअर मिलजवळ तिन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली.
अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्थानकाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर, सहाय्यक फौजदार संजय पाटील, हवालदार सत्यवान पवार, नितीन पाटील, संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवत वाहतूक सुरळीत केली.
सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून अपघाताचे नेमके कारण काय, याचा अधिक तपास धरणगाव पोलीस करीत आहेत.



