जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘शिक्षण संवाद २०२६’ या राज्यस्तरीय कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांनी ‘शालेय स्तरावर योग आणि अध्यात्म’ या महत्त्वपूर्ण विषयावर आपले विचार मांडले.
योग शिक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांच्या सूचनांना उपस्थित मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुंबई येथील जवाहर बालभवन येथे आयोजित या एकदिवसीय कार्यशाळेचे अध्यक्षस्थान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी भूषविले. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात शिक्षण विभागाचे आयुक्त, बालभारतीचे संचालक, शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ उपस्थित होते.
राज्यातील विविध जिल्ह्यांमधून कला, क्रीडा, संगीत, शिक्षण, योग आणि अध्यात्म क्षेत्रातील निवडक तज्ज्ञांना या कार्यशाळेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. शालेय शिक्षण अधिक प्रभावी, संस्कारक्षम आणि विद्यार्थीकेंद्रित करण्याच्या उद्देशाने विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
जळगावच्या मू. जे. महाविद्यालयातील सोहम योग विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग आणि अध्यात्माचा अभ्यासक्रमात प्रभावी समावेश करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी मांडलेल्या सूचना शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसमोर सादर करण्यात आल्या.
या राज्यस्तरीय कार्यशाळेत सहभागाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, शैक्षणिक संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस, मू. जे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य के. पी. नारखेडे, तसेच योग क्षेत्रातील मान्यवर आणि योगसाधकांनी डॉ. देवानंद सोनार यांचे अभिनंदन केले.



