पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा शहरालगत पुनगाव शिवारातील राधाकृष्ण कॉलनीमार्गे कंदीलनगर परिसरात जाणारा महत्त्वाचा पर्यायी रस्ता भर पावसाळ्यात अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. रस्ता बंद करण्याच्या निर्णयाविरोधात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे परिसरातील सुमारे ५० ते ६० कुटुंबांचा दैनंदिन संपर्क तुटल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
रस्ता बंद झाल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भर पावसाळ्यात पर्यायी मार्गही चिखलमय आणि धोकादायक बनल्याने नागरिकांचे हाल होत असून, प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना किंवा पर्यायी व्यवस्था न करता रस्ता बंद केल्याचा आरोप करण्यात आला.
संतप्त नागरिकांनी रस्ता तातडीने खुला करून त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी केली. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
दरम्यान, या प्रश्नावर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका किंवा कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
पावसाळ्यासारख्या संवेदनशील काळात नागरिकांची गैरसोय लक्षात न घेता रस्ता बंद करण्यात आल्याने प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता प्रशासन नागरिकांच्या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



