जळगाव | प्रतिनिधी
संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधत जळगावातील कांचन नगर येथील जय जगदंबा मित्र मंडळात गणरायाच्या पाटपूजनाचा सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला
जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते गणरायाचे विधिवत पाटपूजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.
यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी गणरायाचे पूजन करून मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाला नगरसेवक सागर सोनवणे, विजय बांदल, निलेश तायडे, माजी नगरसेवक किशोर बाविस्कर तसेच युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया यांची प्रमुख उपस्थिती होती.
यंदाही जय जगदंबा मित्र मंडळाने सामाजिक संदेश देणारी आरास साकारण्याचा निर्णय घेतला आहे. “इंधन वाचवा, देश वाचवा” हा संदेश केंद्रस्थानी ठेवत पर्यावरण जनजागृतीवर आधारित देखावा उभारला जाणार आहे. वाढते प्रदूषण, इंधनाची बचत आणि पर्यावरण संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा मंडळाचा प्रयत्न राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तुषार कोळी, राहुल सोनवणे, अंकुश राजपूत, हर्षल राजपूत, प्रदीप राजपूत, वीरेंद्र वाल्हे, ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. पाटपूजन सोहळ्याबरोबरच सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रमामुळे जय जगदंबा मित्र मंडळाच्या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.



