यावल | प्रतिनिधी
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले निंबादेवी धरण यंदाच्या पावसामुळे शंभर टक्के भरले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र धरणाच्या सांडव्यालगत असलेल्या पायऱ्यांजवळील संरक्षक भिंत अतिप्रवाहामुळे खचल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात या ठिकाणी धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.
या संदर्भात शाखा अभियंता वर्षा चव्हाण यांनी धरणाची पाहणी केली. त्यांनी धरणाच्या मुख्य संरचनेला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करत, खचलेल्या भिंतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे यापूर्वीच पाठविण्यात आल्याची माहिती दिली. हा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन दुरुस्तीचे काम सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
निंबादेवी धरणाची पाणीसाठा क्षमता 2.428 दलघमी असून सध्या धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 306 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत असून नायगाव, सावखेडासिम, दहिगाव, शिरसाळ, साकळी, नावरे आणि वडोदे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
दरम्यान, धरणाच्या सांडव्याचे अतिरिक्त पाणी नागादेवी पाझर तलावाकडे वळविण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे नागादेवी पाझर तलावही दरवर्षी भरून दहिगाव, सावखेडासिम आणि मोहराळा परिसरातील शेतीला अतिरिक्त पाण्याचा लाभ मिळू शकणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.



