जळगाव प्रतिनिधी | जळगावात दारूच्या व्यसनाला कंटाळलेल्या कुटुंबीयांनी २६ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राधेश्याम हरचंद राठोड असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मृताच्या आई-वडिलांसह भावाला अटक केली आहे.
पोलिस तपासानुसार, राधेश्याम हा मद्याच्या आहारी गेला होता. दारू पिऊन तो कुटुंबीयांना सतत शिवीगाळ तसेच मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. या त्रासाला कंटाळून कुटुंबीयांनी त्याचा खून केल्याचा आरोप आहे.
तपासात धक्कादायक बाब समोर आली. भाऊ सचिन याने राधेश्यामचे दोन्ही हात पकडले, आई मीराबाई राठोड त्याच्या पायांवर बसली, तर वडिलांनी दोरीच्या साहाय्याने त्याचा गळा आवळल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनेनंतर कुटुंबीयांनी आत्महत्येचा बनाव केल्याचेही समोर आले. मात्र वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांच्या तपासातून हा प्रकार आत्महत्या नसून खून असल्याचे उघड झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



