जळगाव प्रतिनिधी । आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. जळगाव विधान परिषदेच्या जागेवर भाजपने दावा ठोकलेला असतानाच, आता शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या जागेवर शिवसेनेचा हक्क सांगत थेट आपल्या चिरंजीवांसाठी उमेदवारी मागितली आहे. “माझे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासाठी मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून, वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन ही जागा शिवसेनेला सुटेल,” असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगावच्या जागेसाठी सुरुवातीला महायुती म्हणून एकत्र लढण्यावर आम्ही ठाम आहोत. मात्र, जर वरिष्ठ पातळीवर जागांमध्ये फेरबदल झाले, तर जळगावची विधान परिषदेची जागा शिवसेनेसाठी सोडण्यात यावी. आम्ही आतापर्यंत भाजपला खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे काम केले आहे. यापूर्वी शिवसेनेने ही जागा दोन वेळा लढवून जिंकली देखील आहे, त्यामुळे या जागेवर आमचा नैसर्गिक दावा बनतो. शेवटी वरिष्ठ नेते मंडळी मग ती भाजपची असो की शिवसेनेची, जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल, असे सांगत त्यांनी आपण पक्षाचे बंधन पाळणारे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी ‘ऑपरेशन टायगर’ आणि पक्षाच्या रणनीतीवर बोलताना ते म्हणाले, “शेवटी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या मनात काय चालले आहे याबद्दल कोणीच काही सांगू शकत नाही.”
दुसरीकडे, आमदार किशोर पाटील यांच्याकडूनही त्यांच्या मुलासाठी विधान परिषदेच्या उमेदवारीची चर्चा सुरू असल्याचा प्रश्न विचारला असता, गुलाबराव पाटलांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, “त्यांचा मुलगा काय आणि माझा मुलगा काय… मात्र विधान परिषदेसाठी किमान ३० वर्षे वय पूर्ण असावे लागते. त्यांच्या मुलाचे वय सध्या २८ वर्षे आहे. किशोर पाटील स्वतः आमदार असल्यामुळे त्यांना या कायदेशीर गोष्टी माहिती असायला हव्यात.” दरम्यान, शेवटी तो नात्याने माझा नातूच लागतो, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे जळगाव विधान परिषदेची जागा महायुतीत कोणाच्या पदरात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



