वरणगाव प्रतिनिधी | वांजोळा चौक परिसरात गेल्या एका महिन्यात तब्बल १० अपघात घडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे हा चौक वाहनचालकांसाठी अक्षरशः अपघातांचा सापळा बनत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, चौकातील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी, वेगाने धावणारी वाहने, अपुरे दिशादर्शक फलक, तसेच काही ठिकाणी रस्त्याची खराब अवस्था यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची मोठी गर्दी होत असल्याने धोका अधिक वाढत आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या अपघातांमध्ये अनेक जण जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापती झाल्याची माहिती मिळाली आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. चौकात गतिरोधक, सिग्नल व्यवस्था, रस्ते सुरक्षा फलक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.



